Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत मुसळधार पावसांत एनडीआरएफसह लष्कराच्या तुकड्याही तैनात



मुंबई - मुंबईत मुसळधार पावसांत पूरस्थिती, दरडी, इमारत कोसळणे आदी आपत्कालीन घटना घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफसह यावेळी लष्कराच्या तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास रहिवाशांना तत्काळ स्थलांतरीत करण्यासाठी शाळा, शेल्टर, वेल्फेअर सेंटरही उपलब्ध केली जाणार असून यात दोन लाख लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था असेल अशी माहिती संबंधित अधिका-याने दिली.

मुंबईत मुसळधार पावसांत अनेक ठिकाणी पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण होते. मुंबईत सखल भागात पाणी साचून अनेक घरांत पाणी भरण्याच्या घटना घडतात. याशिवाय दरडी, जुन्या धोकादायक इमारती कोसळणे तसेच पाणी तुंबून वसाहतीत पाणी शिरत असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होते. रस्ते, रेल्वे परिसर तसेच वसाहतींचा भाग जलमय झाल्यास मुंबई ठप्प होते. अनेकजण धोक्याच्या स्थितीत अजकून पडतात. सखल भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तलावाचे स्वरुप निर्माण होते. यासाठी पालिका आपली यंत्रणा सज्ज ठेवते. अग्निशमन दल, जीव रक्षक तसेच एनडीआरएफच्या तुकड्याही तैनात असतात. यंदा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्यात वाढ करण्यात आली आहे. या तुकड्या दरडी कोसळण्याची भिती आहे अशा ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. ही कुमक भांडुप, चेंबूर, गोवंडी विभागांमध्ये स्वतंत्रपणे तैनात असणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या प्रत्येक तुकडीमध्ये ४५ जवानांचा समावेश असून मुंबईत १३५ जवानांचा समावेश असलेल्या तीन तुकड्या सध्या कार्यरत आहेत. यात वाढ केली जाणार आहे. असे असतानाही जर परिस्थिती मेजर असेल आणि आवश्यक भासल्यास यंदा लष्कराच्या तुकड्याही सज्ज ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे एनडीआरएफ व लष्कराच्या तुकड्या आपत्कालीन स्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom