मुंबई । प्रतिनिधी - भारताचे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहाला द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
भारताचे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वैज्ञानिक संशोधन आणि संरक्षण तंत्रज्ञान यामध्ये आपले योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कलाम यांच्यामुळेच पुरस्कारांनाच प्रतिष्ठा लाभली आहे. कलाम यांचे नाव देशात आणि जगभरात अनेक वास्तूंना देऊन त्या वास्तूंची प्रतिष्ठा वाढवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव सभागृहाला देऊन सभागृहाची शान वाढवावी अशी मागणी सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. हि ठरावाची सूचना लवकरच पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे.