मागासवर्गीय संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीतील मराठी भाषेची सक्ती तसेच शिक्षणाची अट रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक महासंघ या संघटनेने केली आहे. मुंबईत वसलेल्या रुखी, रोहिदास मेघवाल व मेहतर समाज प्रामुख्याने महानगरपालिकेत या पदावर मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे त्यामुळे या समाजातील उमेदवारांसाठी मराठी भाषेतून दहावी पर्यंत शिक्षणाची अट ठेवणे अन्यायकारक असल्याचा दावा या संघटनेने केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत सध्या चतुर्थ श्रेणी कामगारांची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत नावे नोंदविताना मागासवर्गीय उमेदवारांसाठी इयत्ता दहावी, ४०० रुपये नोंदणी शुल्क तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. या अटींना या संघटनेने विरोध केला आहे. या सर्व अटी रद्द करण्याची मागणी राज्यापाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, पालिका आयुक्त व अनुसूचित जाती जमाती आयोगाला पत्र पाठवून केली आहे. यासाठी महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांचे काम कार्यालयात नसते. बहुतेक सफाईचे काम रस्त्यावरील आहे. त्यामुळे त्याला दहावी पर्यंत शिक्षणाची गरज नसल्याचे संघटनेचे म्हणणे नसून जुन्या नियमाप्रमाणे सातवीपर्यंत शिक्षणाची अट कायम ठेवावी अशी मागणी या संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार तसेच आलजीभाई मारू यांनी केली आहे .