Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

माहिती अधिकाराचा गैरवापर होत असल्यास कारवाई करु - नगरविकास राज्यमंत्री


नागपूर - माहिती अधिकार कायद्याचा कोणी गैरवापर करीत असल्याबाबत पुरावे असल्यास त्याबाबत पोलीस ठाणे किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार करावी, त्यावर कार्यवाही केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे शहरात अनेक जण माहिती अधिकाराचा गैरवापर करीत असल्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, ठाणे महापालिकेकडे माहिती अधिकारातून दरवर्षी साधारण 15 हजार 600 अर्ज प्राप्त होतात. ठराविक व्यक्ती वारंवार अर्ज करीत असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असले तरी माहिती अधिकारात एका व्यक्तिने किती अर्ज करावेत यावर बंधन नाही. माहिती अधिकार अधिनियमातील नियम 8 व 9 मध्ये समाविष्ट बाबींसंदर्भात माहिती देण्याचे बंधन नाही. उर्वरित बाबींसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. काही प्रकरणांमध्ये तक्रार करुन कालांतराने ती मागे घेत असल्याचेही दिसून आले आहे. अशा प्रकरणात चौकशी बंद न करता ती पूर्ण करण्याचा पर्याय महापालिकेसमोर खुला आहे. शहर विकास विभागाच्या मंजुऱ्या व अन्य ज्या बाबींसाठी माहिती अधिकार अर्ज प्राप्त होतात अशा बाबींची माहिती वेबसाईटवर टाकल्यास अर्जाची संख्या कमी होऊ शकते. याबाबत महापालिकेस कळविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom