स्थायी समितीत नगरसेवकांची मागणी -
मुंबई | प्रतिनिधी - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पवई येथे मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भंग कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत क्रेन ऑपरेटरवर गुन्हा दाखल झाला असला तरी संबंधित मिशिगन या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा प्रश्न उपस्थित करत सर्वपक्षीन नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी कंत्राटदारांवर तसेच दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हा नोंदवावा अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी कारवाई काय केली याचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले व संबंधित प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात येत असल्याचे जाहिर केले.
पवई येथे मलनीःसारण वाहिनीचे काम सुरु असताना हायड्रो क्रेनचा माती उचलणारा पुढचा भाग (बकेट) अंगावर कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. या कामगारांच्या नातेवाईकांना अद्याप नुकसान भरपाईही मिळालेली नाही. दुर्घटनेनंतर संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई व्हायला हवी होती, मात्र तसे न होता, क्रेन ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. सद्या दुर्घटनेनंतर होणा-या कारवाईकडे लक्ष वेधले असता गरीबांना न्याय नाही, असे वाटते. कारण अद्याप कंत्राटदार तसेच अधिका-यांवर कारवाई झालेली नाही. घटनेनंतर त्याचा अहवालही प्रशासनाने तय़ार केला नाही. त्यामुळे या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होते आहे, आधी या संबंधित कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा, काय करवाई केली त्याचा अहवाल स्थायी समितीकडे सादर करावा अशी जोरदार मागणी भाजपचे मनोज कोटक, विरोधीपक्षनेते रवीरावा, सपाचे गटनेते रईस शेख आदींनी लावून धरली. श्रीमंतांना एक न्याय व गरीबांना वेगळा न्याय अशी प्रशासनाची कामाची पध्दत चालू देणार नाही, इतके दिवस झाले तरी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झालेला नाही, याचे कारणही प्रशासनाला सांगता येत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. याचे उत्तर मिळेपर्यंत अशा प्रकारच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणीही केली. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन अध्यक्ष कोरगावकर यांनी कारवाईबाबतचा अहवाल देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.