Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीत महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा असेल – मुख्यमंत्री


मुंबई दि 21- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनेल असा विश्वास व्यक्त केला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. आज जे डब्ल्यू मॅरिएट येथे टीआयई ग्लोबल समिट आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देश आणि राज्यभरातून आलेल्या उद्योजकांशी संवाद साधला.

या समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कालच राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 चा समारोप झाला. जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात मेक इन इंडियानंतर अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात आली होती. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकूण 4 हजारहून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठीचे पहिल्या पसंतीचे राज्य असून गेल्या वर्षी देशाच्या परकीय थेट गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात एकूण 51 % गुंतवणूक आली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि इज ऑफ डुईंग बिझनेस यामधील सुलभता यामुळे अधिकाधिक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करतील. आज भारताकडे असलेले कुशल मनुष्यबळ, बुद्धी याचा वापर वाढविण्यासाठी आगामी काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे.

डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर शिर्डी विमानतळानंतर पुणे आणि नागपूर येथे अतिरिक्त विमानतळाच्या कामालाही गती देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 13 नवीन धोरणे जाहीर -
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य शासनाने वेगवेगळी 13 नवीन धोरणे जाहीर केली आहेत. यात लॉजिस्टिक पार्क, वस्त्रोद्योग धोरण, फिन्टेक पॉलिसी, स्टार्ट अप पॉलिसी यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर आणि अहमदनगर येथे अद्ययावत औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. याशिवाय उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या एकत्रितपणे मिळाव्यात यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस यावर भर देण्यात येत आहे. आज महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप धोरणाला प्रोत्साहन देत असून यामुळे राज्यात नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.

पायाभूत सुविधांवर भर देणार -
पायाभूत सुविधांच्या भारतातील एकूण प्रकल्पांपैकी 51 टक्के प्रकल्प महाराष्ट्रातीलआहेत. आज मुंबई ही सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे पायाभूत सुविधातून विकास साध्य करताना मुंबईत पायाभूत सुविधांचे जाळे येत्या काळात निर्माण करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने 258 किमीचे मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सी लिंक, कोस्टल रोड, रो रो सर्व्हिस यामुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचेही  फडणवीस यांनी या समिटमध्ये सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom