Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

निरपराधांवरील खटले मागे घेण्यासाठी आठवले आणि आंबेडकर यांनी एकत्र यावे- राजेंद्र गवई .


मुंबई । प्रतिनिधी - 
भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला. याप्रकरणी अनेक निरपराध कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलननंतर पकडण्यात आलेल्या निरपराध कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरपीआय मधील विविध गटांनी सरकारवर दबाव आणण्याकरिता एकत्र यावे, असे अवाहन रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र गवई बोलत होते. यावेळी बोलताना, भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांनी हल्ला करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांनी ३ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रात बंद पुकारून उत्स्फूर्त आंदोलन केले. या घटनेनंतर कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात धरपकड करण्यात आली. त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. कोल्हापूर येथे तब्बल २००० कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्ह्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना मदत करण्यासाठी सोशल मीडियावर केवळ चर्चा होते. परंतु प्रत्यक्षात पुढे कोणी येत नाही. त्यामुळे निरपराधांवरील खटले मागे घेण्याकरीता सरकारवर दबाव आणण्यासाठी विविध गटात विखुरलेल्या नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन आठवले आणि आंबेडकर यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - 
भीमा कोरेगांव घटनेतील आरोपी मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र त्यांना कायमस्वरूपी जामीन मिळू नये यासाठी सक्षम, अभ्यासू सरकारी वकील नेमण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण पत्र पाठवले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom