मुंबई - विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे इतर भाषेत असलेल्या भाषणाचा मराठीत अनुवाद वाचून दाखविण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाच राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद वाचण्यास अनुवादक नसल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढावली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचे सांगत सभागृहाची माफी मागत संबधित व्यक्तीला संध्याकाळ पर्यंत घरी पाठविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यादांच राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचे अभिभाषण सुरु झाले. तरी त्याच्या मराठी अनुवादन वाचणास सुरुवात झाली नाही. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असून सभागृहाचा तो हक्क आहे. तरीही राज्य सरकारकडून त्याची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत हा सभागृहाचा अपमान असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे –पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर यास उत्तर देताना म्हणाले की, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे याप्रश्नाची दखल घेत असून यातील संबधित व्यक्तीला संध्याकाळ पर्यंत घरी पाठविणार असल्याचे सांगत या झाल्याप्रकाराबद्दल सभागृहाची माफी मागितली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी अनुवाद वाचून न दाखविण्याची कृती ही राज्य सरकारकडून मराठी भाषेचा खून करण्यासारखी आहे. त्यामुळे मराठीचा खून होताना दिसत असूनही शिवसेनाा गप्प कशी काय? असा उपरोधिक प्रश्न केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केवळ मराठी अनुवादक आला नाही. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण गुजराती भाषेत अनुवादीत करण्यात आल्याचे सांगत याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.