मुंबई । प्रतिनिधी - मुंबई क्षयरुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना नुसती औषधें देऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना पौष्टिक आहार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. बाह्य रुग्णांना पौष्टिक आहार मिळत नसल्याने त्यांना वर्षभराचे रेशन पालिकेकडून घरपोच दिले जाते. २४ मार्च हा जागतिक क्षय रोग दिन असल्याने क्षयरोगाबाबत पालिकेकडून पुढील महिनाभर जनजागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमडीआर व एक्सडीआर क्षयरुग्णांना महिनाभराचे रेशन स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते वाटप केले जात आहे.
मुंबईमधील क्षयरोग रुग्णालयात रुग्णांना सकाळी व संध्याकाळी नास्ता व आहार दिला जातो. क्षय रुग्णांना सकाळी नास्त्यामध्ये चहा, दुध, शिरा, उपमा, मोड आलेले कढधान्य, शेंगदाण्याची उसळ, केळी संध्याकाळी एक काप दुध, एक अंडे व दोन ब्रेड दिले जातात. मात्र बाह्य रुग्णांना पौष्टिक आहार देता येणे शक्य नसल्याने पालिकेकडून रुग्णांना रेशन देण्याते येते. मात्र जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय क्षयरोग विभाग दिल्ली यांच्या मार्गदर्शानुसार दुध व अंडी हे नाशवंत पदार्थ असल्याकारणाने बाह्य रुग्णांना डॉट्सच्या उपचारासोबत दररोज देणे शक्य नाही. त्या ऐवजी एमडीआर व एक्सडीआर क्षय रुग्णांना महिन्याभराचे रेशन देणे उपयुक्त ठरेल. त्या अनुषंगाने सेवाभावी संस्थामार्फत एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण, एफ दक्षिण, एम पूर्व या विभागांमध्ये २ हजार रुग्णांना (त्यात ११५ बालरूग्णांचा समावेश आहे) रेशन दिले जाते. एल विभागात डिसेंबर २०१६ पासून एमडीआर व एक्सडीआर ५३ क्षयरुग्णाना रेशन देण्यात येत आहे. इतर रुग्णांना टप्प्याटप्प्प्याने रेशन सुरु करण्यात येईल असे पालिका आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात म्हटले होते. त्याच्या अनुषंगाने कुर्ला विभागातील रुग्णांना डॉ. सईदा खान यांच्या वॉर्डमधील रुग्णांना रेशन वाटप करण्यात आले. याच प्रमाणे मुंबईमधील विविध प्रभागांमधील नगरसेवकांच्या हस्ते रुग्णांना रेशन वाटप केले जात आहे.
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रेशन -
डॉट्स सेंटरकडं नोंदणी असलेल्या रुग्णांना प्रत्येकी ११ किलो रेशन दिलं जाणार आहे. रेशनमध्ये ७ प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश असणार आहेत. त्यात गूळ, शेंगदाणे, गव्हाचं पीठ, मूगडाळ, मटकी, तांदूळ आणि चन्याच्या पीठाचा समावेश असेल. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदतया रेशनपासून पौष्टीक अन्नपदार्थ बनवून त्याचं सेवन केलं, तर त्यातून रुग्णाला १ हजार ४५० एवढ्या कॅलरीज आणि ५५ ग्रॅम प्रथिनं मिळतील. याद्वारे कुठल्याही टीबीच्या रुग्णाला पहिले २ महिने चांगला आहार मिळाल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
जानेवारीत टीबीचे २ हजार ६०३ रुग्ण -
मुंबईत ११ ते २७ जानेवबारी दरम्यान महापालिकेच्या २४ वॉर्डमध्ये 'टीबी' विरोधात मोहीम राबवण्यात आली. त्यात एकूण ६ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार २ हजार ६०३ संशयित रुग्ण आढळले. त्यात ११३ रुग्णांना टीबीचा संसर्ग असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, त्यापैकी ५-६ जणांना एमडीआर लेव्हलचा टीबी असल्याचीही नोंद करण्यात आली आहे.