Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या संख्येत घट

नागपूर - महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली असून अपराध सिद्धीचे प्रमाण 53 टक्के एवढे आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरिता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब सुरु करण्यात आले असून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तपासासाठी प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाईन गुन्हे दाखल करण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. नियम 293 अन्वये या संदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार यांनी चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली असून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात अपराध सिद्धीचे प्रमाण 53 टक्के एवढे असून गुन्हे उघडकीस होण्याच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये क्रेडीट कार्डद्वारे फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली असून वर्षभरात 1522 गुन्हे दाखल झाले आहे. त्याचबरोबर अन्य सायबर गुन्ह्यांमध्ये 4 हजार केसेसमध्ये 1367 जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब सुरु करण्यात आले आहे. राज्यात 43 सायबर लॅब कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सर्ट तयार करण्यासाठी केंद्राकडे परवानगी घेण्यात येत आहे. राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ऑनलाईन एफआयआर नोंद ची सुविधा करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र सायबर डिटेक्शन युनिट (एमसीडीसी) स्थापन करण्यात आले आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून 378 कोटी रुपयांची मालमत्ता तपासात वसूल करण्यात आली आहे. भविष्यात आर्थिक गुन्हेगारीचे आव्हान लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा सुरु करण्यात येणार आहे.

हरविलेल्या मुला मुलींच्या शोध मोहिमेसाठी पोलिसांनी सुरु केलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली असून आतापर्यंत 20 हजार 112 मुला मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विक्रीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून 4449 छापे टाकण्यात आले आहे. त्याद्वारे 23 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. राज्यात अपघाताचे प्रमाण वाढत असतानाच त्यामध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. अपघाती स्थळांचे मॅपींग करण्यात येत असून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मद्य पिऊन वाहन चालविण्याविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत 32 हजार केसेस दाखल करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीतील 71 आरोपींना अटक करण्यात आली असून फिल्पकार्टवर ऑनलाईन शस्त्रास्त्र मागविणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कच्छ, दिल्ली, जामनगर, मुंबई, जनकपुरी, अमृतसर येथील 16 कंपन्यांनी फिल्पकार्टवर शस्त्रास्त्र विक्रीस ठेवले. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नांदेड येथे पोलीस भरती दरम्यान अनुचित प्रकार आढळून आला त्याची दखल घेत पोलीस भरतीच्या परीक्षा एकत्रित ‘महापरीक्षा’ पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

धुळे राईनपाडा येथील घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ही घटना निर्घृण आहे. भटक्या समाजाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी विविध आयोगांनी ज्या शिफारशी केल्या आहेत, त्यावर निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. भटक्या समाजाला घर देण्याकरिता त्यांचा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समावेश केला जाईल. राईनपाडा येथील घटनेबाबतचा खटला जलदगती न्यायालयात यावा म्हणून उच्च न्यायालयाला विनंती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom