मुंबई - घाटकोपर येथील घाटकोपर-वर्सोवा लिंक रोडवर मंगळवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान भरधाव रिक्षा आणि अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या खाजगी बसच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले आहेत.
खिमगर विश्रामगिरी गोस्वामी (५४) असे मरण पावलेल्या इसमाचे नाव असून कांतिगर गोस्वामी, विश्रामगर गोस्वामी, मंगेश प्रवासी आणि स्वत: रिक्षाचालक राजेंद्र वीरसिंग ठाकूर (४४) असे चार जण जखमी झाले आहेत. खिमगर आणि कांतिगर, विश्रामगर हे तिघे सख्खे भाऊ असून त्यांचे वडाळा येथे किराणामालाचे दुकान आहे. घाटकोपर-वर्सोवा लिंक रोड, जागृतीनगर मेट्रो स्थानकाजवळ या रस्त्याच्या अंधेरीकडील वाहिनीचे काम सध्या बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी बस आणि इतर वाहनांच्या अनधिकृतपणे पार्किंग केल्या जात आहेत. येथूनच घाटकोपर रेल्वे स्थानकाकडून असल्फाकडे अनधिकृतपणे चार प्रवासी घेऊन रिक्षाचालक राजेंद्र ठाकूर निघाला होता. मुख्य रस्ता सोडून त्याने लवकर पोहोचण्यासाठी रहदारीसाठी बंद असलेल्या आणि अनधिकृपणे गाड्या पार्किंग केलेल्या रस्त्यावरून भरधाव वेगात रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. अशातच एका बसचा सामान ठेवण्याच्या डिकीचा दरवाजा उघडा होता. रिक्षाचालकाला भरधाव वेगात समोर उघडा असलेला दरवाजा चुकवता आला नाही आणि त्याने त्या दरवाजाला जोरदार धडक देत बसच्या पुढील भागाला धडक दिली. त्यात बसचा दरवाजा तुटून वेगळा झाला तर रिक्षाचा देखील चक्काचूर झाला.