
मुंबई - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात तिघा आरोपींनी अविनाश सोलंकी ऊर्फ बाली या मित्राची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी निलेश रवींद्र शुक्ल (३८), वंश बहादूर सिंग ऊर्फ जग्गा (४८) व अंकित अरुण दुबे (५९) या तिघांना अटक केली. आरोपींना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली..
दुबे हा मृत बाली याचा अंगरक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाली हा पोलिसांचा खबऱ्या व पवई येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील साक्षीदार होता. बाली याचा मृतदेह २० ऑगस्ट रोजी पहाटे अपोलो औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्यात सापडला. हा गाळा आरोपी निलेश शुक्ल याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी निलेश शुक्ल व जग्गा या दोघांनी बाली याची हत्या करून ते प्रथम उत्तराखंड येथे हरिद्वार व हृषिकेश येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक केदार पवार व उपनिरीक्षक भुजबळ यांचे पथक तेथे गेले. तेथे त्यांचा शोध घेतला असता पोलीस पथकाला हे आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचे समजले. तत्काळ हे पथक तेथे गेले व या दोघा आरोपींना जेरबंद करून मुंबईत आणले. बाली याच्या हत्येमध्ये त्याचा अंगरक्षक अंकित दुबे याने या आरोपींना मदत केल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. पैशाच्या वादातून या तिघांनी बाली याची हत्या केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वपोनि. नितीन अलकनुरे यांनी या प्रकरणात मोलाची कामगिरी केली.