
मुंबई - भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते. नुकताच केंद्र सरकारने मुंबईचा सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. अशा या सुरक्षित शहरात साडेपाच वर्षात तब्बल ४९१७९ दुर्घटनेत ९८७ लोकांची बळी ३०६६ जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
झाडे, झाडांच्या फांद्या पडणे, दरड कोसळणे, घर, घरांचे छत कोसळणे, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळणे, तडे जाणे, आगीच्या घटना, गॅस गळती, रस्त्यावर आईल पडणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, मैनहोलमध्ये पडून मृत्यू होणे आदी घटनांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला २०१३ ते २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या, तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले आहे, याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिली. जुलै २०१३ ते २०१८ पर्यंत एकूण ४९१७९ आपत्कालीन दुर्घटनेत झाल्या आहे. या दुर्घटनेत ९८७ जणांचा मृत्यू, तर ३०६६ जण जखमी झाले आहेत.