दोन वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार - ऊर्जामंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोन वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार - ऊर्जामंत्री

Share This
मुंबई, दि. 16 : येत्या दोन वर्षात महावितरणद्वारे राज्यात 3200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयत झालेल्या बैठकीत दिली. महावितरणच्या 16झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंत्याकडून 200 मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

यावेळी या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, विश्वास पाठक उपस्थित होते.

राज्यातील सर्व नळयोजना, उपसा सिंचन योजना (खासगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायतीमधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात याबाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणाअंतर्गत या योजना राबवण्यात याव्यात तसेच या योजनेकरिता 500 कोटीचे बजेट तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील.

एचव्हीडीएस, इन्फ्रा - 2, दीनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च 2019 पर्यंत इन्फ्रा 2, दीनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगरपालिकेद्वारे रस्ता पुनर्स्थापना दर मान्य न केल्यामुळे पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण करावीत. तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहोचणे शक्य नाही, त्या भागात सौर कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.

राज्यात 750 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरणकडून तर महाजनकोकडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages