मुंबई - शहरातील जमीन संपल्याने आता गावठाण आणि कोळीवाड्याच्या जागेवर सरकारचा डोळा आहे. त्यासाठी बिल्डर असलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जात आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. गावठाणे आणि कोळीवाडे वाचवायचे असतील तर बिल्डर उमेदवारांना मतदान न करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले. शिवाजी पार्क येथे वंचित आघाडीच्या सभेमध्ये आंबेडकर बोलत होते. यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या १८८८ च्या कायद्याप्रमाणे गावठाण व कोळी वाड्याच्या जमिनीचा मालक कोळी, भंडारी, इस्ट इंडियन आहेत. मात्र, सरकार त्यांना त्यांचा अधिकार देत नाही. मुंबईमध्ये जमीन शिल्लक राहिलेल्या नाहीत. मुंबईत फक्त कोळवाड्यामधील व गावठाणाच्या जमिनी आहेत, त्या लाटण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. त्यासाठी बिल्डर असलेल्याना उमेदवारी दिली जाईल. लोकसभेची निवडणूक संपल्यावर कोळीवाड्यांच्या जमिनीवर जेसीबी फिरणार आहे. त्यामुळे बिल्डरच्या उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन आंबेडकर यान केले.
मोफत शिक्षण देऊ -
सत्तेत आल्यास संपूर्ण शिक्षण मोफत करू. त्यासाठी काहीही करू, अलुतेदार आणि बलुतेदार यांना आर्थिक मदत होण्यासाठी बँकिंग व्यवस्था निर्माण करू. त्यात ९० टक्के कर्ज विना तारण देऊ, असेही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच आता ओबीसी समाजाला शिष्यवृत्ती मिळत नसून शिक्षणाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती दुप्पट करायची वेळ आल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात असलेल्या दुष्काळावरही तोडगा निघू शकतो, पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगताना आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांकडून पाण्याचे नियोजन होत नसल्याचे म्हटले. मोदींच्या गुजरातचा प्रश्न असल्याने तापी आणि नर्मदा नद्यांचे ३५ टीएमसी पाणी गुजरातला द्यायचा डाव सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
'काँग्रेसशी विचारधारेचा लढा'
काँग्रेसशी आमचा लढा जागांचा नाही, तर विचारधारेचा आहे. आम्हाला आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणायचे आहे. त्यावर काँग्रेस काहीही बोलायला तयार नाही. आता राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचे सांगत आहे. त्यांनाही धर्म दिसतो आहे. कुणीही असो, ते मनुवादकडेच झुकल्याचे दिसत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आरएसएसवर कारवाईबाबत मागणी केली. तसेच त्यावर बोलायला सांगितले. मात्र, ते यावर बोलत नाहीत. ते केवळ जागांचा मुद्दा असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसने पुन्हा आपल्या धर्मनिरपक्षतेवर यावे असे आवाहन आंबेडकर यांनी केले.