मुंबई - प्लास्टिक पिशवी वापरणा-या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने शुक्रवारपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी प्लास्टिक आढळलेल्या ६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. या कारवाईत २२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ९५ हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी चांगलीच महागात पडणार आहे.
पालिकेने प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून पालिकेच्या विशेष टीमकडून प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाते असून प्लास्टिक पिशवी आढळल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. असे असताना अनेक फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्याला ‘ब्लॅक लिस्ट’ करून ‘फेरीवाला परवाना प्रक्रियेतून’ बाद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. या निर्णयाची जोरदार अंमलबजावणी सुरु झाली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पालिकेच्या विशेष प्लास्टिक विरोधी टीमने तपासणी केली असता फेरीवाल्यांकडे आढळलेले २२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर ९५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. ही कारवाई अजून तीव्र केली जाणार असून प्लास्टिक वापरणा-या फेरीवाल्यांचा थेट परवाना रद्द केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.
३५ हजार किलो प्लास्टिक जप्त -२३ जूनपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल ३५ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येत आहे.