मुंबई, दि. 15 : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या बँकिंग खात्यासंदर्भात पारदर्शीपणा व आर्थिक व्यवहाराची पडताळणी होण्यासाठी बँकिंग अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे ,असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी केले. मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभाग व मुंबई शहर अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आयोजित बँक अधिकारी वर्गाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची बँक खाती, त्या खात्यात होणारे व्यवहार यासंदर्भात अधिक जागरुकतेने व जबाबदारीने बँक अधिकाऱ्यांनी काम पाहावे. तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गानेदेखील निवडणूक प्रक्रिया नीट समजून घ्यावी, ई.व्ही.एम.ची कार्यपद्धती देखील समजून घ्यावी. लोकांना समजून सांगावी. निवडणूक पारदर्शी व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .
तसेच संगणकीय सादरीकरण व प्रात्यक्षिकाद्वारे या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी तरुणकुमार खत्री, बँक ऑफ इंडियाचे मुंबई दक्षिण विभाग क्षेत्रीय प्रबंधक मीनाकेतन दास, अग्रणी बँक व्यवस्थापक संजीव वसंत सापते, आर्थिक व्यवहार सल्लागार सुधीर विनायक पत्की आदी उपस्थित होते. खत्री यांनीही उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. निवडणुकीदरम्यान विविध टप्प्यांची माहिती दिली व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यशाळेस स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, रत्नाकर बँक, युको बँक, येस बँक, डीसीबी बँक, इंडियन ओव्हरसीज बँक,देना बँक, सिंडिकेट बँक, अॅक्सिस बँक व इतर बँकांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.