पुणे - राज्यात तयार झालेली वंचित आघाडी ही किंचित आघाडी आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सत्ता हवी असल्यास प्रकाश आंबेडकरांनी एनडीएला पाठिंबा देण्याचेही आवाहन आठवले यांनी केले.
आठवले म्हणाले, खरे तर शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता विसरून युती झाली. मात्र, प्रकाश आंबेडकर आणि आमचा वाद काही मिटत नाही. आमच्यात काही टोकाचा वाद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांच्या काही सभा फक्त मोठ्या झाल्या. पण त्यामुळे त्यांना मतं मिळणार नाहीत. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद किंचित आहे, त्यांचा परिणाम फार काही होणार नाही. उलट त्यांच्यामुळे मत विभागणी होऊन भाजप-सेनेला फायदाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर यांना सत्ता हवी असेल तर त्यांनी एनडीएला छुपा पाठिंबा न देता एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी आंबेडकरांना केले. आम्हाला या निवडणुकीत भरघोस मत मिळतील, या निवडणुकीत भाजपला 282 जागांचा टप्पा पार करेल. तर एनडीएला 360 जागा मिळतील. काँग्रेसची अवस्था खराब झाली असल्याची टोलाही त्यांनी यावेळी लगावला.