.jpeg)
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले असून पालिका प्रशासनाने प्रभागनिहाय याद्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये मागील पाच वर्षात तब्बल सात लाख १२ हजार ९२५ नवीन मतदार वाढले आहेत. यावर लोकांना १ जुलैपर्यंत हरकती, सूचना मांडता येणार आहे. त्यानंतत ९ जुलै रोजी अंतीम मतदार यादी जाहिर केली जाणार आहे. मतदार यादीत नाव नसेल, दुस-या ठिकाणी नाव नोंद झाले असेल तर त्यांनी संबंधित वॉर्डात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर महापालिकेने २३६ प्रभागांची सोडत ३१ मे रोजी काढून त्यावर १ जून ते ६ जून रोजी हरकती, सूचना मागवल्या. याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतर आयोगाने १३ जून रोजी प्रभाग रचना निश्चित करून त्याबाबत अधिसूचना जाहिर केली. आता पालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्यांचे कामही पूर्ण केले असून त्या २३ जून रोजी जाहिर केल्या आहेत. या याद्यानुसार २०१७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी म्हणजे पाच वर्षापूर्वी ९१ लाख ६४ हजार १२५ मतदार होते. तर २०२२ पर्यंत ९८ लाख ७७ हजार ५० इतके मतदार झाले आहेत. यानुसार मागील पाच वर्षात ७ लाख १२ हजार ९२५ नवीन मतदार वाढले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या महापालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे विभाजन करताना मतदाराचा चूकून प्रभाग बदलला असेल किंवा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसेल अशा चुका झाल्या असतील तर त्याची दुरूस्ती करून यादीत अंतर्भाव केला जाणार आहे. यासाठी नागरिकांनी पालिकेच्या विभाग निवडणूक कार्यालयात तसेत बाहेरगावी असलेल्यांनी इमेलवर संपर्क करावा, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
२०१७ साली एकूण मतदार - ९१६४१२५
२०२२ साली एकूण मतदार - ९८७७०५०
मागील पाच वर्षात वाढलेले एकूण मतदार - ७१२९२५