
मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कोश्यारी यांना अस बोलायची हिंमत होते तरी कशी? यापूर्वीही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी आक्षेपाहार्य विधान केले होते. राज्यपाल यांना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नसून त्वरित त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, (Governor should resign) अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. कोश्यारी यांनी या आधी अनेक वेळा महाराष्ट्रतील नागरिकांचा अपमान केला आहे. महात्मा फुलेंचा अपमान करण्यापासून ते गुजराती आणि मारवाड्यांनी मुंबई बनवण्यापर्यंत आणि महाराष्ट्रीयांकडे क्षमता नाही, असे सांगण्यापर्यंत अनेकवेळा त्यांनी आमच्या राज्याचा अपमान केला असून यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी आणि आपल्या पदाचा त्वरित त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणल्या की, बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे नेते आहेत. ते आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांची तुलना भाजपाच्या कोणत्याही नेत्याशी करणे म्हणजे बाबासाहेबांच्या उंचीचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा अवमान करणे होय, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले.