मायानगरीत सात महिन्यांपासून 119 बेवारस मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मायानगरीत सात महिन्यांपासून 119 बेवारस मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत

Share This
मुंबई - दररोज लाखो माणसे मुंबईत मुंग्यांसारखी धावपळ करताना दिसतात. कविवर्य नारायण सुर्वे यांनी येथील विदारक परिस्थितीचे वर्णन "या जिंदगानीत माणूस सस्ता आणि बकरा महाग झाला,‘ असे केले आहे. अशा या मायानगरीत सात महिन्यांपासून 119 बेवारस मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रमुख रुग्णालयांच्या शवविच्छेदन केंद्रांत हे मृतदेह पडून आहेत. या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावेत, यासाठी अनेकदा संबंधित पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 


जे. जे., राजावाडी, कूपर आणि भगवती शवविच्छेदन केंद्रे पोलिस शल्यचिकित्सक विभागाच्या अखत्यारित येतात. तीन वर्षांपासून अशा मृतदेहांचे प्रमाण वाढू लागले आहे. विशेष म्हणजे, या चारही केंद्रांत सध्या 119 बेवारस मृतदेह पडून आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत, यासाठी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सहायक आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या चारपैकी दोन शववाहिन्या कूपर शवविच्छेदन केंद्रात पाठवण्यात आल्या. त्यातील एका शववाहिनीला चालकच नाही. त्यामुळे तीही "बेवारसा‘सारखी उभी आहे. दुसऱ्या शववाहिनीला फोन केल्यानंतर ती शवविच्छेदन केंद्रात येते.
शवविच्छेदन केंद्र ......बेवारस मृतदेहांची संख्या
भगवती 54
जे. जे. 18
कूपर 20
राजावाडी 27
(फेब्रुवारी ते ऑक्‍टोबर 2014 )

वर्ष.................. मृतदेहांची संख्या
2011 1,012
2012 1,053
2013 1,153

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages