मुंबईत तब्बल ९५ हजार भटके कुत्रे
मुंबई / प्रतिनिधी -
भटक्या कुत्र्यांना मारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने आतापर्यंत अश्या भटक्या कुत्र्यांनी मुंबईत सुमारे १३ लाख लोकांना चावले आहे. भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुले ४२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आजारी व चवताळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारण्याची परवानगी नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे आता अशा कुत्र्यांना मारणे महापालिकेला सोपे जाणार आहे.
मुंबईत भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात असली तरी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मुंबईत ९५ हजार १७२ भटके कुत्रे असल्याची गणना झालेली आहे. त्यामध्ये ४२ हजार २८६ नर तर ५२ हजार ८९६ मादी आहेत. यात रस्त्यांवर ६६ हजार ८७ तर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे २९ हजार भटके कुत्रे आहेत. यापैकी आतापर्यंत ६९ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईमधून पालिकेकडे सन १९९४ ते ऑक्टोबर २०१५ या काळात भटक्या कुत्र्यांबाबतच्या ८८ हजार ८७३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेकडे ८८ हजार ८७३ तक्रारी आल्या असल्या तरी आतापर्यंत १३ लाख १२ हजार १६० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्रा चावल्यामुळे ४२९ जणांचे बळी गेले आहेत. सन २०११पासून कुत्र्यांनी चावा घेतल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या कमी झाली असली तरी यावर्षी ११ महिन्यातच तब्बल ५ जणांचा मृत्यू कुत्रा चावल्यामुळे झाला आहे. सन २०१५ मधील ११ महिन्यांत तब्बल ४६ हजार ६४७ लोकांना भटके कुत्रे चावले आहेत.
मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांची नसबंदी केली जात असताना कुत्र्यांची संख्या ९५ हजाराच्या वर गेली आहे. सन २०११ पूर्वी कुत्र्याने चावा घेतल्याने मोठ्या संखेने लोकांचा मृत्यू होत होता. सन २०१ १ नंतर ही आकडेवारी ५० टक्क्यांनी कमी असल्याचा दावा महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला असला तरी मुंबईकर नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्यापासून आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून वाचवणारी योजना पालिकेने राबवावी अशी मागणी केली जात आहे.

No comments:
Post a Comment