शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2015

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 12 डिसेंबर – 
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (वय 81) यांचे आज (शनिवार) सकाळी नऊ वाजता पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. शरद जोशी हे 2004 ते 2010 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शरद जोशी यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया 
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा कणखर आवाज हरपला - सुधीर मुनगंटीवार
शेतकरी संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ नेते  राज्यसभेचे माजी खासदार शरद  जोशी यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भाष्य करणारा कणखर आवाज हरपला आहे अशा शब्दात वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीतील अडचणी आणि  शेती विकास यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या नेत्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य माणसासाठी लढा दिला.  महिला आरक्षणासारख्या मुददयावर त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. ते जागतिक शेती फोरमचे सदस्यही होते.  शेती उत्पादनाबरोबर शेतीच्या अर्थकारणाचा सखोल अभ्यास करून  कृषी बाजारपेठांचा विकास  आणि शेतीतील तंत्रज्ञान यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचे आणि कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


शेतकरी समस्यांचं वास्तवादी भान व त्या सोडवण्याची जाण असलेला नेता हरपला - धनंजय मुंडे 
शेतकऱ्यांच्या समस्यांचं अचूक निदान करुन त्या सोडवण्यासाठी वास्तववादी उपाय शोधणारे नेते म्हणून शरद जोशी नेहमीच आपल्या स्मरणात राहतील, असा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाने वास्तवाचं भान असलेला अभ्यासू, लढवय्या नेता शेतकऱ्यांनी गमावला आहे. शरद जोशींनी कांदा, उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, सारख्या पिकांना रास्त भाव मिळावा, म्हणून आंदोलनं केली. ही आंदोलनं तत्कालिन नव्हती त्यामागे सखोल विचार होता. या आंदोलनांमधूनच त्यांनी शेतकरी हक्काची चळवळ राज्याबाहेर नेली. राज्याबाहेर देशातही मान्यता लाभलेलं त्यांचं नेतृत्व होतं.

त्यांच्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी विदेशातील विद्यापीठांचे विद्यार्थी महाराष्ट्रात येत, इतकं त्यांचं काम सर्वदूर पोहचलं होतं. शासनानं लागू केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा सर्वार्थानं 'गो'पाळ हत्या कायदा आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी चळवळीचं मोठं नुकसान झाल आहे.



'शेतकर्‍यांना हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारा मार्गदर्शक हरपला' - रावसाहेब दानवे 
शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकर्‍यांचे महान लढवय्या नेते शरद जोशी यांना मी महाराष्ट्र भाजपातर्फे श्रद्धांजली वाहतो. शरद जोशी यांनी शेतकर्‍यांना शेतीचे अर्थशास्त्र समजावून सांगितले. चुकीच्या व्यवस्थेमुळे शेतकर्‍याला उत्पादन खर्चही मिळत नाही व तो आर्थिक संकटात राहतो, हे सर्वप्रथम शरद जोशी यांनी शेतकर्‍यांना समजावले. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे ही जाणीव त्यांनी निर्माण केली व शेतकर्‍यांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करायला त्यांनी शिकवले. त्यांच्या कामामुळे आज शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी किफायतशीर भाव मिळाला पाहिजे हे तत्व सर्वांनी मान्य केले आहे. शरद जोशी यांच्या कार्यामुळे ठिकठिकाणी शेतकरी आक्रमकपणे आपले हक्क मिळवत आहेत. त्यांच्या निधनामुळे देशाची हानी झाली आहे व शेतकर्‍यांचा मार्गदर्शक हरपला आहे.

शरद जोशी यांचा जीवनपट
जन्म - ३ सप्टेंबर १९३५
जन्मस्थान - सातारा
वडील - स्व. अनंत नारायण जोशी
आई - स्व. इंदिरा अनंत जोशी
पत्नी - लीला (१९४३ - १९८२)
कन्या - सौ. श्रेया शहाणे (कॅनडा)
, डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
शिक्षण
प्राथमिक - रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक - रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी - १९५१
बी.कॉम - १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
एम.कॉम - १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक - बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक
आयपीएस - आयपीएस (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार - 2004 ते 2010 राज्यसभेचे सदस्य

- कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
- भारतीय टपाल सेवा, प्रथम श्रेणी अधिकारी. १९५८-१९६८ पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
- मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे. 
- शेतकरी संघटनेची स्थापना : १९७९ ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
- १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने
- देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना : ३१ ऑक्टोंबर १९८२
- महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने स्त्री प्रश्नांची मांडणी
- चांदवड (जि. नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
- स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
- शेतकरी महिला आघाडीची स्थापना
- महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
- महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी
- ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरूषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नोंदविली गेली.
- दारूदुकानबंदी आंदोलन 
- पंचायत राज्य बळकाव आंदोलन संस्थात्मक कार्य

कार्य
- स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
- देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
- स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१० विशेष पदनियुक्ती
- अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१) कॅबिनेट दर्जा. "राष्ट्रीय कृषिनीती " चा मसुदा
- राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
- स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य१९९७
- अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). कॅबिनेट दर्जा. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल
- २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य जागतिक स्तर
- जागतिक कृषिमंच (World Agriculture forum)  सेंट लुई (अमेरिका) च्या सल्लागार मंडळाचे सदस्य १९९९ पासून.
- अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी नियमित निमंत्रित.

लिखाण/संपादन
- शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
- ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे,

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
- शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
- प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
- चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
- शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
- स्वातंत्र्य का नासले?
- खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
- अंगारमळा
- जग बदलणारी पुस्तके
- अन्वयार्थ - १,२
- माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
- बळीचे राज्य येणार आहे
- अर्थ तो सांगतो पुन्हा
- पोशिंद्याची लोकशाही
- भारतासाठी
- राष्ट्रीय कृषिनीती

इंग्रजी ग्रंथसंपदा
- Answering before God
- The Women‘s Question
- Bharat Eye view
- Bharat Speaks Out
- Down To Earth

हिंदी ग्रंथसंपदा
- समस्याए भारत की
- स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad