झाड पडून मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2018

झाड पडून मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी


कंत्रादारांच्या दंडाच्या रक्कमेतही वाढ करण्याची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत चेंबूर येथे झाड पडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या चुकीमुळे आणि दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्यावर मुंबई महानगरपालिकेकडून तुटपुंजी मदत केली जाते. या मदतीच्या रकमेत वाढ करून दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करावी, एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्यालाही पालिकेने आर्थिक मदत करावी तसेच कंत्रादारांकडून जो दंड आकारण्यात येतो त्या दंडाच्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका, एम पूर्वच्या प्रभाग समिती अध्यक्षा समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. काते यांच्या मागणी प्रमाणेच मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक व माजी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनीही ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. सदर ठरावाच्या सूचना येत्या सभागृहामध्ये मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईच्या चेंबूर येथील कांचननाथ या मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना त्यांच्या डोक्यावर नारळाचे झाड पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. कांचननाथ यांचे प्रकरण ताजे असतानाच चेंबूर विभागातच कामावर जाण्यासाठी बेस्ट बसची वाट बघत बसलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या डोक्यावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला. घोडेस्वार या घरातील एकट्या कमावत्या व्यक्ती होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना व्याजावर पैसे घेऊन अंतिमसंस्कार करावे लागले होते. या दुर्घटनांनंतर झाडे पडून मृत्यू पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ कारण्याची मागणी केली जात होती. या अनुषंगाने समृद्धी काते व प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

मुंबई हवामानाच्या बदलामुळे झाडे उन्मळून पडल्याने दुर्घटना घडतात. धोकादायक अवस्थेतील झाडे तोडण्यासाठी कंत्राटदारांकडून दिलेल्या वेळेत झाडे तोडली जात नाहीत. परिणामी अशा दुर्घटनेमध्ये अंगावर झाड पडून आपत्कालीन मृत्यू ओढवतो किंवा एखादा व्यक्ती जखमी होतो. यामुळे त्यांच्या कुटुंबातील आर्थिक कणा मोडून जातो. पालिकेकडून जखमी झालेल्याना आर्थिक मदत दिली जात नाही. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून १ लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येते. पालिकेकडून दिली जाणारी रक्कम तुटपुंजी आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा पालिकेच्या हलगर्जीमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपयांची मदत द्यावी तसेच जखमी व्यक्तीला त्याला झालेल्या इजेनुसार नुकसान भरपाई द्यावी. याच बरोबर धोकादायक स्थितीतील झाड तोडण्याकरिता कंत्राटदारकडून उशीर झाल्यास त्याला ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. या दंडाच्या रक्कमेत वाढ करून दंडाची रक्कम ५० हजार रुपये करावी अशी मागणी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS