मुंबईत पाणी कपातीचे संकट? - तलावात फक्त १८ टक्केच पाणीसाठा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत पाणी कपातीचे संकट? - तलावात फक्त १८ टक्केच पाणीसाठा

Share This


मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या तलावात अवघे १८ टक्केच पाणीसाठा असून अजून काही दिवस पुरेसा पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट उभे राहणार आहे. पालिका पुढील एक आठवडा पुरेसा पावसाची प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतरही अपेक्षित पाऊस न पडल्यास प्रशासनाकडून पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिका वर्षभऱाच्या पाण्याचे नियोजन करते. त्यानुसार सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४४७३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावातून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यानुसार पालिका वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करीत असते. मागील दोन वर्षात सुरुवातीलाच अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर तलाव क्षेत्रात अपेक्षित बरसलेला नाही. मागील २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव भरला होता. १८ ऑगस्टला मोडकसागर व २० ऑगस्टला तानसा तलाव भरला होता. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सगळ्या छोट्या असलेल्या तुळशी तलावाचा अपवाद वगळता अन्य तलावातील पाणी साठा कमी आहे. सध्या सातही तलावांमध्ये मिळून २ लाख ५१ हजार ११९ दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे.

मागील दोन वर्षाची स्थिती -
गेल्यावर्षी याच कालावाधीत ३ लाख ४७ हजार १२३ दशलक्ष लीटर पाणीसाठा होता.त्यापूर्वी, २०१९ मध्ये त्याच कालावधीत जवळपास दुप्पट म्हणजे ६ लाख ७९ हजार ९३२ दशलक्ष लीटर पाणीसाठा होता.

सध्या केवळ १७.३५ टक्के पाणी उपलब्ध -
सद्यस्थितीत तलावांमध्ये केवळ १७. ३५ टक्के पाणी साठा राहिला आहे. २०२० मध्ये ही टक्केवारी २३.९८ टक्के आणि २०१९ मध्ये ४६.९८ टक्के इतका पाणी साठा होता.
 
एका आठवड्यात निर्णय?
सध्या मुंबई आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. मात्र अजूनही तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस पडेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे एक आठवडा पावसाची प्रतीक्षा केली जाणार आहे. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यास प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages