
एका महिलेने पाच महिन्यांची गर्भवती असताना बाळाची वाढ आणि हृदयाचे ठोके तपासण्यासाठी सोनोग्राफी केली. बालरोग तज्ज्ञांनी अपेक्षित सर्व चाचण्या करुन घेतल्या. तेव्हा आईचा पोटात दोन गर्भ तयार झाले असल्याचे आढळून आले. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकारामुळे नवदाम्पत्याच्या पायाखालची वाळू सरकली. मातेच्या पोटातील अर्भकावर शस्त्रक्रिया करून अर्भक काढणे जिकिरीचे काम होते. त्यांनी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले. मुंबईतील हॉस्पिटल्स पालथी घातली. मात्र नऊ महिन्यांनी महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जन्मलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत होती. परंतु बाळाच्या पोटात असलेल्या गर्भाला, योग्य पोषण मिळाले नसल्याने ते मृत झाल्याचे निदर्शनास आले. आरोग्याच्या तक्रारी, पुढे जाऊन इतर अवयवांवरही होणारे गंभीर परिणाम लक्षात घेत, मृत गर्भ (गाठ) शरीराबाहेर तातडीने काढणे गरजेचे होते. पालकांनीही बाळ महिन्याचे झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
महालक्ष्मी येथील हाजीअली जवळील नारायण हेल्थ केअर हॉस्पिटलध्ये बाळाला उपचार्थ दाखल केले. दरम्यान, रुग्णालयातील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सरिता भागवत यांनी ही शस्त्रक्रिया करण्याची जोखीम पत्करली. फार मोठे आव्हान या डॉक्टरांसमोर होते. तरीही मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत, मूत्राशय आणि आतडे या अवयवांना कोणतीही इजा होऊ न देता, जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात ही संपूर्ण गाठ काढण्यात यश आले. बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. भागवत, भूलतज्ज्ञ डॉ. नंदिनी दवे, नियोनाटोलॉजिस्ट डॉ सायरस कॉन्ट्रॅक्टर, डॉ अमित नागपुरे, डॉ हर्षदा पंगम आणि डॉ नकुल कोठारी यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका आठवड्याने बाळाला घरी सोडण्यात आले असून त्याची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق