मुंबई - देशात गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या काळात शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आल्या. मात्र डिसेंबर महिन्यात कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचा प्रसार वाढला आहे. पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
देशभरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. राज्यातही कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर शाळा सुरू केल्यावर अहमदनगर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जर कोरोना, ओमायक्रॉनचे रुग्ण असेच वाढत राहिले तर राज्यात वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतील असा इशारा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झाले आहे. पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
आता सुट्टीचा हंगाम आहे. त्यामुळे पर्यटन परिसर बंद करणं ही चांगली कल्पना ठरणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. नागरिकांनी मास्क घालावे, गर्दीत जाऊ नये, सुरक्षित अंतर राखावे, हात वारंवार स्वच धुवावे या कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.