
मुंबई - मुंबईत रविवारपासून पावसाने दमदार सुरुवात केली असून सोमवारीही जोरदार बरसला. मुंबई व उपनगरांत सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यानंतर हलक्या सरीसह आकाश ढगाळ राहिले. वातावरणात निर्माण झालेला गारवा मुंबईकरांना सुखावून गेला. दरम्यान येत्या २४ तासांत मुंबईत ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात करीत संततधार कोसळला. सायंकाळी पाच वाजता समुद्रात भरती होती. ४.२२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. याचवेळी जोरदार पाऊस कोसळल्य़ास सखळ भागात पाणी साचण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंबई महापालिका पाणी साचणा-या विभागांवर लक्ष ठेऊन होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने तशी स्थिती निर्माण झाली नाही. समुद्राला उधाण आले होते. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आले होते. सोमवारी शहरात ४३.०१ मिमी, पूर्व उपनगरांत १०.२१ मीमी तर पश्चिम उपनगरांत १५.३९ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात रविवारी नैऋत्य मोसमी वा-यांनी संपूर्ण भाग व्यापल्याने सोमवारपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق