
मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटामध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळाले. चर्चेत असलेले आमदार कॅबिनेट पदावर बसले. तर बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगू लागली. अशातच बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपक्ष उमेदवारांना संधी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यात बच्चू कडू यांचाही समावेश आहे, याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नंदनवन या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सगळ्यातच थोडी नाराजी असते. तशी माझ्यातही आहे. पण इतकी जास्तही नाही की, गटाला सोडून दुस-या गटात जाईल अशी नाराजी नाही. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पुढील विस्तार बाकी आहे. जर मंत्रिमंडळाचा सगळा विस्तार झाला असता आणि अशी परिस्थिती असती तर गोष्ट वेगळी असती. मी फक्त मंत्रिपदासाठी त्यांच्यासोबत नाही.
आम्ही काही मुद्यांमुळे त्यांना सपोर्ट केला आहे. जर ते म्हणाले असते की आम्ही पद देऊ शकत नाही तर गोष्ट वेगळी असती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते मंत्रिपद देऊ. पहिल्या यादीत नाही दिलं पण दुस-या यादीत बघूया. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचे थांबवले नाही, काही दिवसांसाठी थांबवले आहे. एकत्र राहायचे म्हणजे समजून घ्यावे लागणार. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हे राजकारण आहे. इथे २ अधिक २ = ४ ही होत आणि शून्य पण होऊ शकत त्यामुळे काय होईल सांगता येत नाही, असेही कडू म्हणाले.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق