![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhO_y5zygMcSDEibnq0S541bZAIOBuMR0ybIfm6w7Xniy57bSFZaiV-N_OWrTSo9qryTls8UHgE8cM1jw8oazsuCQA-UuSfqlTDE_OWoEEOAn__znl0IivLiXtP85NXZl_Q92NJjjDvHN6OxffZNoGoXN-atzuh04sHko-YOcXi2O21Vbl9TXfO0aZo/w640-h320/image.png)
मुंबई - मुंबईत सुरू झालेल्या नवरात्रौत्सवासाठी पालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मंडळांनी परवानगीसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. संपूर्ण शहर आणि उपनगर भागातील जवळपास १३०४ नवरात्रौत्सव मंडळांना आतापर्यंत परवानगी दिली आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी पालिकेने विसर्जन स्थळांसह काही भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था कायम ठेवली आहे. मुंबईत नवरात्रौत्सवासाठी पालिकेकडून विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. यंदाचा नवरात्रौत्सव मुंबईकरांसाठी सुरक्षित पार पडावा यासाठीची खबरदारी पालिकेकडून घेण्यात आली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
मुंबईत आतापर्यंत १३०४ नवरात्रौत्सव मंडळाना परवानगी देण्यात आली आहे. एकुण १७०० नवरात्रौत्सव मंडळांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले होते. यामध्ये काही मंडळांनी दुबार अर्ज केले होते. अशा मंडळांनी संख्या २५० इतकी होती. तर महापालिकेकडून एकुण १६२ नवरात्रौत्सव मंडळांचे अर्ज हे काही कारणात्सव फेटाळण्यात आल्याचेही बिरादार यांनी सांगितले. नवरात्रौत्सव कालावधीत विसर्जनाच्या सुविधेअंतर्गत वीज, खड्डेमुक्त रस्ते तसेच बोटी, डॉक्टर्स अशी सुविधा पालिकेकडून देण्यात आली आहे. तर नैसर्गिक ठिकाणीही देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची सुविधा पालिकेने पुरवल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक स्थळांसोबतच पालिकेकडून कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही विसर्जनाचे आवाहन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी मोठे सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment