Lok Sabha Election - आचारसंहिता म्हणजे काय ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2024

Lok Sabha Election - आचारसंहिता म्हणजे काय ?


मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता (code of conduct) लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ? ती कोण लागू करतं ? या दरम्यान कोणती कार्य बंद राहतात, आणि कोणती कामं सुरू राहतात ? या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. (What is code of conduct) 

आचार संहिता म्हणजे काय ?
देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसबा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये संसद आणि राज्य विधानमंडळांच्या मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्याचे पालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. आचारसंहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. आचार संहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे.

आचार संहिता कधीपर्यंत असते ?
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते. यावेळी आचारसंहिता आजपासून (16 मार्च 2024) लागू होईल. कारण आज निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आचारसंहिता समाप्त होते.

सामान्य लोकांनाही नियम लागू -
एखाद्या सामान्य व्यक्तीनेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचार संहितेच्या नियमांतर्गत कारवाई केली जाते. म्हणजेच, तुम्ही जर एखाद्या राजकीय नेत्यासाठी प्राचर करत असाल तर तुम्हालाही आचार संहितेच्या नियमांबद्दल जागरूक रहावे लागेल. एखादा राजकीय नेता तुम्हाला या नियमांबाहेर जाऊन काम करण्यास सांगत असेल तर तुम्ही त्यांना आचार संहितेच्या नियमांबद्दल सांगून असे करण्यापासून रोखू शकता. कारण असे कोणतेही कार्य केल्यास कारवाई होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास अटकही होऊ शकते.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास काय होतं ?
निवडणूक आचार संहिता लागू झाल्यावर अनेक नियमही लागू होतात. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता, या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. याशिवाय, निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी, गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवहार, लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे, भीती घालणे यासारख्या कारवायांना आळा बसेल याचीही काळजी घेतली जाते. याचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाते. एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो. (संबंधित) उमेदवाराला निवडणूक लढण्यापासूनही रोखता येते. तसेच त्याच्याविरोधात FIR ही दाखल केली जाऊ शकते. दोषी सिद्ध झाल्यास त्या संबंधित उमेदवाराला तुरूंगातही जावे लागू शकते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad