लोकलमधून रात्री ११ नंतरचा प्रवास महिलांसाठी असुरक्षित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2024

लोकलमधून रात्री ११ नंतरचा प्रवास महिलांसाठी असुरक्षित


मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत सुरक्षा यंत्रणांना गंभीरपणे विचार करायला लावणारे वास्तव सर्वेक्षणातून अधोरेखित आले आहे. लोकलमधील रात्री ९नंतरचा रेल्वे प्रवास असुरक्षित असल्याचे सांगत ४० टक्के महिलांनी रात्री ११ नंतर आणि ४२ टक्के महिला प्रवाशांनी मध्यरात्री धावणाऱ्या लोकलमधील प्रवास असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. २८ टक्के महिलांना रात्री १० नंतरचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी उपाय करण्यासाठी आपले मत नोंदवले आहे, अशी बाब पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सर्वेक्षणाअंती समोर आली आहे.

रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाने मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांचे अनुभव, समस्या, शिफारशी याबाबत आढावा घेण्यासाठी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासासाठी लोकलचा किती वेळा वापर, प्रवासमार्ग, पासधारक-तिकीटधारक, वय, प्रवासाचे कारण, प्रवासाची वेळ, कोणत्या वेळेत असुरक्षितता वाटते, लोकल डब्यासह फलाटांवरील सुरक्षितता, गणवेशधारी पोलिस असावेत का, अशा प्रश्नांना महिला प्रवाशांनी सर्वेक्षणात उत्तरे दिली. १ ते ३१ मार्च कालावधीत महिला सर्वेक्षण पार पडले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत २१ ऑनलाइन प्रश्नावलीच्या सर्व्हेमध्ये जवळपास तीन हजार महिला प्रवाशांनी सहभाग घेतला. यात ५७ टक्क्यांहून अधिक नोकरदार महिला, १५ ते २५ वयोगटातील ३५ टक्के तरुणींचा आणि ८ टक्के अन्य यांचा समावेश होता.

तक्रारीसाठी पुढाकार नाही -
- रेल्वे प्रवास करताना एखादा गुन्हा घडल्यास केवळ २९ टक्के महिलाच तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलिस ठाणे गाठतात.
- उर्वरित ७१ पैकी, ६४ टक्के महिला केवळ भीतीपोटी आणि १२ टक्के महिला लैंगिक गुन्ह्यात लाजेखातर तक्रार करण्यास धजावत नाही.
- चोरीच्या बाबतीत मालमत्ता किंवा वस्तूची किंमत तक्रार करण्यासारखी नसल्याचे सांगत १२ टक्के महिला प्रवाशांनी तक्रार दाखल करत नाही, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad