मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली आहे.
नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज यूडायसमधील पेनआयडीद्वारे ऑनलाइन पद्धतीने शाळांमार्फत भरायचा आहे. तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे श्रेयांक हस्तांतरणाचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळांद्वारे भरण्यात येणार आहेत.
सर्व माध्यमिक शाळांनी परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी शाळा खात्यातील शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक या बाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून अंतिम केल्यानंतर अर्ज भरायच्या कालावधीत माध्यमिक शाळांच्या लॉग इनमधून उपलब्ध करुन दिलेल्या प्रिलिस्टची मुद्रित प्रत घेऊन विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेल्या सर्व माहितीची सर्वसाधारण नोंद वहीनुसार पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

No comments:
Post a Comment