नागपूर- राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सरकारने फेरीवाला धोरणाबाबत तातडीने लक्ष दिले नाही, तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या २ टक्के ही फेरीवाल्यांची मर्यादा आहे. शहरी नागरिकांच्या हक्कांप्रमाणेच फेरीवाल्यांनाही हक्क प्राप्त करून द्यावे लागतील. ही बाब लक्षात घेत या त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नगर परिक्षेत्र समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात फेरीवाल्यांच्या ८ सदस्यांचा समावेश आहेे. एकट्या मुंबईत तीन लाखांहून जास्त फेरीवाले आहेत, तर पुण्यात बायोमेट्रिक सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत २८ हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्याचेही पाटील म्हणाले.