मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षी 11 हजार कोटी रुपयांनी कमी करण्यात आला होता. पारदर्शक आणि वास्तववादी अर्थसंकल्प अशी घोषणा करत ३७ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात कपात करत 25 हजार 141 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र या अर्थसंकल्पातील 35 टक्के रक्कमच प्रशासनाला खर्च करण्यात यश आले आहे. यामुळे 2 फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मांडल्या जाणा-य़ा अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा सन 2016 -17 चा अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपयांचा मांडण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षात अर्थसंकल्पात अनेक न झालेल्या कामांवरही करोडोंची तरतूद केली जात असल्याने अर्थसंकल्प वाढत गेला होता. यामुळे सन 2017-18 चा अर्थसंकल्प फुगीर आकडेवारीचा न मांडता वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. सन 2016 -17 च्या अर्थसंकल्पापेक्षा 11 हजार कोटी रुपयांची कपात करून आयुक्तांनी 25 हजार 141 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पातील 35 टक्केच खर्च करण्यात आले. बजेटमधील खर्च मार्च महिन्या अखेरपर्यंत करणे आवश्यक आहे. रस्ते दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. मागील वर्षी रस्ते दुरुस्तीवर अवघा 4 टक्के खर्च झाला होता, यावर्षी 51 टक्के, पुलांची दुरुस्तीवर 58 टक्के मागील वर्षी फक्त 14 टक्के खर्च झाला. देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कच-यापासून वीज निर्मिती व कचरा विल्हेवाटीसाठी 19 टक्केच खर्च झाला आहे. मागील वर्षी 36 टक्के खर्च झाला होता. आता येत्या 2 फेब्रुवारीला मांडला जाणा-या अर्थसंकल्पात काय तरतूदी असणार याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. रुग्णालयातील सुविधांच्या नावावर शुल्क वाढवले आहे. पाणी, मार्केटच्या परवाना शुल्कासाठी, विक्री केल्या जाणा-या सामानावर शुल्क, जीएसटी लागू झाल्यानंतर झालेला तोटा भरून काढण्यासाठी झोपडीधारकांवरही कर आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 फेब्रुवारीला मांडला जाणारा अर्थसंकल्प किती कोटींचा असणार? त्यात काय तरतूद केली असणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.