
मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या पाणी बिलाची तब्बल ३२० कोटींची थकबाकी असल्याचे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या म्हाडा, आरोग्य, गृह विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचा समावेश आहे. सर्वाधिक १६ हजार ६७५.१९ कोटींची थकबाकी म्हाडाकडे असल्याचे उघड झाले आहे. ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी नगरसेवकां कडून सातत्याने होत आहे.पालिकेनेही याबाबत पाठपुरावा केला .मात्र शासनाने अद्याप ही थकबाकी दिली नाही.दरम्यान, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातील पोलीस वसाहती, शासकीय वसाहती, इमारती, कार्यालये आदींच्या पाण्याच्या थकीत बिलांबाबतची माहिती मागितली होती. पालिकेचे जलाभियंता तवाडीया यांनी दिलेल्या लेखी माहितीतून शासनाच्या विविध विभागाकडे ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुमारे ३२० कोटी,९८ लाख ,४३ हजार एवढी थकबाकी आल्याचे उघडकीस आले आहे.सर्वाधिक १६६७५ .१९ कोटींची थकबाकी म्हाडाकडे आहे.गृह विभागाकडे ७३०२ कोटी, ग्राम विकास विभागाकडे ४५४१.०८ कोटी, प्रधान सचिव वन विभाग ७१८.०९, सार्वजनिक आरोग्य विभाग ७०९.४६ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग ६९४.११ कोटी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्ध विकास ५३३.९५ कोटी तर नगर विकास विभागाकडे ५१५ .५३ कोटींची थकबाकी आहे. शिक्षण, महसुल, विधी व न्याय विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडेही पाणी बिलापोटी कोट्यावधींची थकबाकी असल्याचेही तवाडीया यांनी नमूद केले आहे. दरम्यान, मुंबईतील विभागांची, नागरिकांची पाणी बिलाची थकबाकी वसूल करताना त्यांची जलजोडणी न तोडता पाणीबिल वसूल करावे, असे निर्देश अनंत नर यांनी प्रशासनाला दिले आहेत.