नवी दिल्ली - भारतीय संस्कृतीत तथागत बुद्धांनी सांगितलेली धम्म देसनेची पाळेमुळे रुजलेली आहेत. बुद्धांच्या अस्तित्वाचे दर्शन करण्यासाठी भारतातील बुद्धिस्ट सर्कीट जगासाठी खुले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. गुरुवारी सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान भवनात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ६ व्या आंतराराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला, त्या वेळी राष्ट्रपती बोलत होते. उद्घाटन समारंभ कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. जे. अल्फोंस यांनी केली. या वेळी पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामत्सू, पर्यटन विभागाचे महासंचालक सत्यजित राजन मंचावर उपस्थित होते. या परिषदेच्या उदघाटन सोहळ्यास राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. भारतातून बौद्ध धर्म आशिया खंडात आणि जगभर पसरला. बौद्ध धर्माने अध्यात्मासह जगाला बरेच काही दिले असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, बौद्ध धर्म ज्ञानाचे वाहक आहे. बौद्ध धर्माने कला आणि शिल्पाला जोपासले असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. ध्यानसाधनेच्या अनेक पारंब्या बौद्ध धर्मात आहेत. पुरातन काळात बौद्ध उपासक-उपासिकांमुळेच देश-विदेशात भंतेंनी बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. बौद्ध धर्मामुळे इसवी सनपूर्वीच भारताचे नाते जगाशी जोडले गेले असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञान हे आजही मागदर्शक असल्याचे राष्ट्रपतींनी या वेळी सांगितले.
३० राष्ट्रांतील २०० प्रतिनिधींची उपस्थिती -
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने संकेतस्थळाची सुरुवात राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आली. तसेच भारतातील बौद्ध स्थळांवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे जपान हे भागीदार आहे. परिषदेस भारतीय उपमहाखंडातील देशांचे पर्यटनमंत्री उपस्थित होते. यासह भंते, बौद्ध धम्माचे अभ्यासक, खाजगी पर्यटन सेवा पुरवणाऱ्या पर्यटन संस्था असे ३० देशांतील २०० प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते. तीन दिवस चालणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. सर्व २०० प्रतिनिधींना अजंठा, राजगीर, नालंदा, बोधगया येथे घेऊन जाण्यात येईल. ही परिषद दर दोन वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
महाराष्ट्र सज्ज -
सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम प्रथमच अजंठा येथे होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. महाराष्ट्र बिहारच्या राजगीर, नालंदा बोधगया आणि उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे परिषद होणार आहे. शुक्रवार, २४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या ठिकाणी परिषद होणार आहे. अजंठा लेणींचा समावेश युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांमध्ये आहे. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक खजिना जगासाठी खुला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३०० बुद्धिस्ट लेणी आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यांची माहितीही जगभर पोहोचेल, असा विश्वास रावल यांनी या वेळी व्यक्त केला. परिषदेत सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्रातील मराठमोळ्या संस्कृतीच्या स्वागताने नक्कीच भारावतील आणि वारंवार महाराष्ट्रात पर्यटनासाठी येतील, असा विश्वासही रावल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय ऐतिहासिक लेणी, स्तुप, चैत्य याबाबतचे सादरीकरण महाराष्ट्राचे पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवस यांनी केले.