मुंबई - राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्याथ्र्याला दूध भुकटीचे २०० ग्रॅमचे एक पाकीट अशी तीन महिन्यांसाठी पाकिटे देण्यात येणार आहेत.
पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादकांनी केलेल्या आंदोलनावेळी राज्य सरकारकडून दूध भुकटीचा समावेश पोषण आहारात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकच्या 'क्षीर भाग्य योजने'चा अभ्यास करून ही दूध भूकटी वाटपाची योजना राबवण्यात येत आहे. ही योजना सुरुवातीला ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आणि त्यानंतर कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची समितीही नेमण्यात आली आहे. दूध भुकटीपासून दूध कसे तयार करायचे याची माहिती पालकांना देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळांनी 'दूध भुकटी वाटप दिवस' जाहीर करून समिती सदस्यांच्या उपस्थितीत प्रत्येक विद्याथ्र्याला दूध भूकटीची तीन पाकिटे द्यावीत, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.