मुंबई - देशाच्या सीमेवर देशावासीयांची रक्षा करत असताना धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या वीरपत्नीला एसटी महामंडळाने मदतीचा हात देऊ केलेला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या राज्यातील शहीद जवानांच्या ६३९ वीरपत्नींना महामंडळातर्फे आजीवन मोफ त प्रवासासाठी पास देण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या ९० वीरपत्नींना हे मोफत पास देण्यात आले आहेत. महामंडळातर्फे समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबवण्याचे काम परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. समाजातील आदिवासी, नक्षलग्रस्त तरु ण-तरुणांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी त्यांना महामंडळामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटी महामंडळातर्फे 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान' योजनेंतर्गत एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवासाची सवलत लागू केलेली आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील ६३९ वीरपत्नींना हा पास देण्यात आलेला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वीरपत्नींची संख्या सर्वाधिक म्हणजे ९० आहे. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये ७८, पुणे ७५ तर सांगलीमधील ७१ वीरपत्नींनी एसटीचा पास घेतला आहे.