Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दलितांचे मतदान माझ्यासोबत - रामदास आठवले


मुंबई - कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारची फार मोठी घोडदौड सुरू आहे.त्याला घाबरून दलितांमध्ये संभ्रम पासरविण्यासाठी घटना बदलणार हा काँग्रेसकडून चुकीचा खोडसाळ प्रचार केला जात आहे. मात्र काँग्रेसचा खोटा प्रचार आंबेडकरी जनता उधळून लावेल. संविधान ही तर आमची जान आहे. असे सांगत दलितांचे मतदान माझ्यासोबत बहुसंख्य असून आगामी निवडणुकांत काँग्रेसने कितीही थयथयाट केला तरी रिपब्लिकन पक्ष भाजप युतीचे सरकार आगामी निवडणुकीत निश्चित विजयी. शिवसेना सोबत असो अथवा नसो भाजप रिपाइं युतीचा विजय निश्चित होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइंच्या ठाणे येथील ६१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

देश जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे. घटनेतील भारत उभा करण्यासाठी जोडण्याची प्रक्रिया सुरू करावे लागेल. समतेसाठी लढा उभारावा लागेल. सर्व जाती धर्मा वरील वाद मिटवावे लागतील. असे आवाहन आठवलेंनी यावेळी केले. पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणल्यास 30 रुपयांनी कमी होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचार करावा. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल दरवाढी मुळे त्रास होत आहे ते दर कमी करावेत.अशी सूचना ना रामदास आठवलेंनी केली.

मराठा समाजाला जर खरेच आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत कायदा करावा लागेल. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी संसदेत सरकार ने ऍट्रोसिटी कायदा संमत केला. ऍट्रोसिटी कायद्याचा गैरवापर करून आपले दुश्मन वाढवू नका. सतत दलित मराठा वाद नको, महाराष्ट्र बंद मध्ये आम्ही होतो मात्र दलित मराठा वाद झाला नाही. भीमाकोरेगाव आंदोलनातील गुन्हे रद्द करण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप रद्द झाले नाहीत ते सर्व गुन्हे त्वरीत रद्द करावेत अशी मागणी आठवले यांनी केली. महात्मा फुले महामंडळाला राज्यमंत्री दर्जा दिला पाहीजे. मला केंद्रात कॅबिनेट दर्जा मिळाला पाहिजे. भाजप सोबत शिवसेना राहो अथवा न राहो आम्ही राहणार आहोत. असे आठवले म्हणाले .

औरंगाबाद मध्ये दोन पक्ष आणि अनेक संघटनांची मिळून सभा झाली. मात्र ठाण्यात आज माझ्या एकट्या पक्षाची सभा आहे. प्रचंड संख्येने लोक उपस्थित आहेत ही काय माणसे नाहीत काय? 2019 मध्ये करायचं काय ? मोदी फडणवीस यांना साथ द्यायची आहे. काँग्रेस ने जे 60 वर्षांत केले नाही ते मोदिंच्या नेतृत्वात भाजपने केले असून लंडन चे घर ते इंदूमिल पर्यंत च्या स्मारकांचा प्रश्न मोदी आणि फडणवीस यांनी सोडविला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपला रिपाइंची साथ असणार आहे असे आठवले यांनी जाहीर केले.

इंदूमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट पुतळा उभा राहणार आहे. त्यात चबुतरा 90 फूट आणि पुतळा 260 फूट त्या उंचीवरून वाद करू नका. असे आवाहन आठवले यांनी केले. काँग्रेसने कितीही थयथयाट केला तरी भाजप रिपाइं युती जिंकणार आहे. 2000 सलापर्यंत भूमिहीनांचे अतिक्रमण नियमित करावे. मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे. अशी मागणी करून 2011 पर्यंतच्या झोपडया कायदेशीर करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे आठवले म्हणाले. दलितांचे सर्व मतदान प्रकाश आंबेडकरांसोबत आहे असा कोणी गैरसमज करू नये. माझ्यासोबत सुद्धा दलितांचे बहुसंख्य मतदान आहे. लोकसभेला आमच्या पक्षाला 2 जागा द्याव्यात त्या निवडून आल्यास पक्षाला मान्यता मिळेल असे आठवले म्हणाले.

या मेळाव्यास राज्यातून रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष फारुखभाई दळवी, जगदीश गायकवाड, भगवान भालेराव, प्रल्हाद जाधव, सिद्राम ओव्हाळ, महेंद्र शिर्के, बाळाराम गायकवाड,  हेमंत सावंत, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, ऍड अभया सोनवणे, संगीता आठवले, बाळाराम गायकवाड, रमेश मकासरे, उत्तम कांबळे, बाळासाहेब गरुड, विनोद चांदमारे, प्रभाकर पोखरीकर, संदेश उमप, गाथा ढाले,  पद्मा इंगळे, रमेश गायकवाड, सचिन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom