
मुंबई - येत्या १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला २०३ वर्ष पूर्ण होत असून या विजयस्तंभाला हारफुलांसह वह्या पेन आणि पुस्तकांची मानवंदना देत समाज शिक्षित करण्याची प्रतिज्ञा करूया असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर झालेल्या युध्दाला येत्या १ जानेवारी २०२२ रोजी १०३ वर्ष पूर्ण होत आहेत डिसेंबर १८१७ मध्ये झालेल्या या युद्धात तत्कालिन महार बटालियनने पराक्रमाची शर्थ करीत एक जाज्वल्य ईतिहास लिहीला होता या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठावर विजयस्तंभ उभारण्यात आला असून डाॅ बाबासाहेब आंबेडकर न चुकता दरवर्षी १ जानेवारी रोजी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असत.देशविदेशातील आंबेडकर जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी १ जानेवारी रोजी येऊन आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी येत असते. विद्यमान परीस्थितीत ढाल, तलवार, भाले व बंदुकी आदी शस्त्रांची जागा शिक्षणाने घेतली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या अनुयायांना शिक्षित होण्याचा संदेश दिला होता.त्यांचा शिक्षणाचा हा मौलिक संदेश अंमलात आणण्यासाठी तसेच शिक्षणापासून वंचित राहीलेल्या समाजातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी भीमा कोरेगावला येताना हारफुलांसोबतच वह्या, पेन, पुस्तके, दप्तरे या शैक्षणिक वस्तूंसह वापरात नसलेले संगणक मोबाईल, आदी साहीत्य विजयस्तंभावर उभारण्यात येणा-या एक वही एक पेन अभियानच्या स्टाॅलवर घेऊन यावे असे आवाहन कोरेगाव भीमा रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे (९९२२५५५५६३) तसेच महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके (९३७२३४३१०८) यांनी केले आहे.