Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईत २७५ पंप लावून पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा केला, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा


मुंबई - मुंबईत आज मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. हे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी २७५ पंप लावण्यात आले. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने झाला अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. मुंबईला हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम असल्यावरच घराबाहेर पडावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (275 pumps were use to drain the accumulated rain water)
 
मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी हिंदमाता, अंधेरी भूयारी मार्ग येथे भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, सहायक आयुक्त (एफ दक्षिण) महेश पाटील, सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पश्चिम) डॉ. पृथ्वीराज चौहाण आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरात चार तासांच्या कालावधीत १२५ मिमी पाऊस पडला. अल्पावधीत झालेल्या पावसामुळे विविध सखल ठिकाणी मिळून पाणी उपसा करणारे २७५ पंप सुरू होते. परिणामी पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी मदत झाली. दुपारी जोरदार पाऊस आणि भरती एकाचवेळी असलेल्या काळात काही अतिसखल भागात थोड्या प्रमाणात साचताच पाणी उपसा करणारे पंप कार्यरत झाले आणि त्वरेने पाणी निचरा करण्यात आला. संपूर्ण मुंबईत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार अलर्ट मोडवर असून आपल्या कार्यक्षेत्रात सक्रिय आहेत, असे आयुक्त डॉ. चहल यांनी पाहणी दौऱ्यात प्रसार माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार, अतिधोकादायक स्थितीत असणाऱ्या ९५ इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. या रहिवाशांची निवाऱ्याची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याची हमी बृहन्मुंबई महानगरपालिका घेत आहे. धोकादायक इमारतीत वास्तव्य करून जीव धोक्यात घालण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी जाणे, अधिक योग्य आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणातील इमारतीच्या रहिवाशांना हमीपत्र देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची महानगरपालिकेची तयारी आहे, असेही आयुक्त चहल म्हणाले.

मुंबई महानगरासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे महानगरातील नागरिकांनी अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom