मुंबई - बाळासाहेबांच्या आजारपणात "मातोश्री' परिसरात होणारी गर्दी आणि त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेला जनसागर नियंत्रणात ठेवण्याची अवघड कामगिरी पोलिसांनी कार्यक्षमपणे पार पाडली, त्याबद्दल पोलिस दलाचे कौतुक होत आहे.
शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारादरम्यान बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस, रॅपिड ऍक्शन फोर्स, एसआरपीएफ, होमगार्ड अशा एकूण 20 हजार कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा असे दुहेरी आव्हान पोलिसांनी यशस्वीपणे पेलले. पोलिसांनी अहोरात्र कडकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
विदर्भात 30 टक्के; तर इतर शहरांमध्ये 100 टक्के "बंद' पाळण्यात आल्याची माहिती आहे. पुणे, सातारा, कळंबोली (नवी मुंबई), भद्रकाली (नाशिक), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) या ठिकाणी एस.टी. बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या.
मुंबई आणि राज्यभरातून 12 ते 15 लाखांचा जनसागर बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोटला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.