मंदिर प्रवेशाचा प्रश्न सातशे वर्षापूर्वीचा - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंदिर प्रवेशाचा प्रश्न सातशे वर्षापूर्वीचा - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

Share This

मंदिर प्रवेशाचा प्रश्न अलीकडचा नव्हे, तर 700 वर्षापूर्वीचा असून तत्कालीन संत साहित्यात याचा संदर्भ असल्याचे प्रतिपादन 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. 

काटदरे मंगल कार्यालयात स्नेहवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित हेमंत व्याख्यानमालेत 'साहित्य समाज आणि संस्कृती' या विषयावर डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बाराव्या-तेराव्या शतकातले संत साहित्य पाहिले असता त्याकाळी कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातींचे कमालीचे दमन होत असल्याचे लक्षात येते. संत नामदेव, संत चोखामेळा आदींच्या अभंगांतही याचा संदर्भ पाहायला मिळतो. साहित्य व संस्कृती यांचे नातेही त्यांनी उलगडून दाखवले. ते म्हणाले की साहित्य केवळ करमणूक, स्वप्नरंजन वा इतिहासात जाण्याचे माध्यम नाही. साहित्य संस्कृतीचे शुद्धीकरणही करत असते. संस्कृतीचा प्रवाह कुठेतरी अडकल्यानंतर त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते. ते काम लेखक, कवी, विचारवंत साहित्याच्या माध्यमातून करत असतात. त्यासाठी त्यांना व्यवस्थेशी संघर्ष करावा लागतो. कुठलाही समाज संस्कृतीशिवाय जगू शकत नसल्याचे मत डॉ. कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. संस्कृती स्वयंसिद्ध असत नाही. माणसाच्या वर्तनातून आणि निर्णयातून संस्कृती निर्माण होत असते. संस्कृतीचे अर्थ व्यवस्थेशी घट्ट नाते असते. अनेक भारतीय प्रभू श्रीरामचंद्राला आदर्श मानत असले तरी द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात येईपर्यंत भारतात एकापेक्षा अधिक विवाह होत होते. विशेषत: विपुल संपत्ती व जमीन असलेले लोक वहिवाटीसाठी अशा प्रकारे विवाह करत होते हे याचेच उदाहरण असल्याचे कोत्तापल्ले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages