पालिकेचे ७0 मोटारपंप बंद अवस्थेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेचे ७0 मोटारपंप बंद अवस्थेत

Share This
मुंबई : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आणि मुंबईत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या झडपा वेळेवर उघडल्या न गेल्यानेच मुंबईत पाणी तुंबल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात साचलेले पाणी काढण्यासाठी १८५ ठिकाणी २२0 उदंचन पंप बसवण्यात आल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले होते, मात्र मुंबईतील पालिकेचे ७0 मोटरपंप चक्क बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे पाणी उपसण्यासाठी २२0 मोटरपंप बसवण्यात आले; परंतु तरीही सखल भागातील पाणी काढण्यात पालिकेला अपयश आले, कारण यातील ७0 मोटारपंप बंद अवस्थेत आहेत. मुंबईत १८0 ठिकाणे पाणी साचण्याची म्हणून निश्‍चित करण्यात आलेली आहेत, मात्र मुंबईत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे यातील फोलपणा स्पष्ट झाला असून डिझेल नाही, पंप चालवणारे कर्मचारी नाहीत, तर काही पंपांची चाचणीच घेतली गेली नसल्यामुळे २२0 पंपांपैकी ७0 पंप सुरूच झाले नाहीत. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर त्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, गांधी नगर, मिलिंद नगर, घाटकोपर आणि कफ परेड या भागात पाणी साचले. विक्रोळी-जोगेश्‍वरी रोडवरील मिलिंद नगर भागातील रस्त्यावरही पाणी साचले. अंधेरीच्या चकाला भागासह उपनगरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. दरम्यान, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पंप बसवण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराचा एक माणूस पालिकेच्या आपत्कालीन कक्षात जातीने बसणार असून पंप लावण्यात आलेल्या जागेवर तो कोऑर्डिनेट करणार आहे. त्यामुळे मुंबईत साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages