रिक्षा संपाविरोधात मनसे वाहतूक सेना आक्रमक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिक्षा संपाविरोधात मनसे वाहतूक सेना आक्रमक

Share This
मुंबई : मुंबई ऑटोमेन्स युनियनने आपल्या विविध मागण्यांकरिता पुकारलेला बंद केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी शरद राव यांनी केलेला स्टंट आणि राज्य सरकारमधील मित्र काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप मनसे उपाध्यक्ष आणि मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केला आहे.

राव यांच्या मागणीप्रमाणे ऑटोरिक्षासाठी १.५ किमीसाठी ४५ रुपये भाडे लागू करणे हे कितपत योग्य आहे? शिवाय आपल्या या मागणीसाठी राज्य सरकारशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याऐवजी सर्वसामान्य प्रवासी जनतेला वेठीस धरून ते काय साध्य करणार आहेत, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही या विषयांवर राज्य सरकारशी झालेल्या अनेक चर्चांमध्ये राव याबाबत बोलताना दिसत नाहीत, मात्र दरवेळी बंद पुकारत रस्त्यावर उतरतात, हा प्रकार अनाकलनीय असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. दरम्यान, महागाईच्या दृष्टीने रिक्षाचालक आणि सर्वसामान्य प्रवासी या दोघांनाही परवडेल असे भाडे लागू करणे आवश्यक आहे. तसेच रिक्षा चालवण्यासाठी सीएनजी गॅसवर सबसिडी मिळायला हवी. रिक्षाचालकांना वाहनांवर जाहिरात लावून दरमहा ठराविक उत्पन्न मिळावे याशिवाय आमच्या संघटनेच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे न्याय मिळवून देण्यास सक्षम असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील आमचे सर्व सभासद रिक्षाचालक या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages