महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू

Share This
मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या महायुतीत विधानसभा निवडणुकी साठीच्या जागावाटपावरून मात्र जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये अधिक जागांची एकमेकांकडे मागणी केली जात असतानाच महायुतीमधील घटक पक्षांनी देखील आक्रमक पवित्रा स्वीकारत आपल्या पदरात अधिकाधिक जागा पाडण्यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइंने ५९, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३८, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ३0 तर विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने १५ जागांची मागणी केल्याने सेना आणि भाजपा नेते कोंडीत सापडले आहेत. यावर आता काय उतारा काढणार, याकडे राजकीय वतरुळात लक्ष लागून राहिले आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला हद्दपार करण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने रिपाइं, स्वाभिमानी, रासप या घटक पक्षांना एकत्रित आणत महायुती अस्तित्वात आणली. निवडणुकीच्या यशानंतर महायुतीत शिवसंग्राम देखील सहभागी झाली. लोकसभा निवडणुकीतील यश हे एकट्या भाजपाचे नव्हते तर त्यामध्ये आमचा देखील महत्त्वाचा वाटा होता, असा हेका आता या घटक पक्षांनी लावून धरत आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागांची मागणी करण्यास सुरुवात झाली आहे. वास्तविक युतीमधील महत्त्वाचे पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्येच गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून जोरदार घमासान सुरू आहे. 

शिवसेनेने १६९ जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजपाला हे मान्य नाही. यात रिपाइंने ५९ जागांची तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३८ जागा, राष्ट्रीय समाज पक्षाने ३0 तर शिवसंग्राम पक्षाने १५ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे दोघांच्या जागावाटपाअधीच घटक पक्षांनी जागेची मागणी केल्याने महायुतीतील तिढा वाढण्याची शक्यता आहे. आता या घटक पक्षांना किती जागा देणार? हा प्रश्नच आहे. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्री पद देण्याचे आश्‍वासन दिले गेले होते; परंतु अद्यापि त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आठवले महायुतीच्या नेत्यांवर नाराज असतानाच त्यांनी अधिक जागांची मागणी करत दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. महायुतीतील जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगला असल्याने घटक पक्षांच्या मागण्या कितपत तग धरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत असले तरी महायुतीच्या अस्तित्वाबाबतही राजकीय वतरुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages