स्वच्छ भारत अभियान - 30 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छता शपथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वच्छ भारत अभियान - 30 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छता शपथ

Share This
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील वाल्मिकी बस्ती परिसरातून  महत्त्वाकांक्षी "स्वच्छ भारत अभियानाचा" शुभारंभ केला. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान  लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करुन झाल्यावर पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी स्वत: नवी दिल्लीतील स्व्च्छता कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या वाल्मिकी परिसरात स्वच्छता केली. त्यानंतर मोदी यांनी राजपथवर स्वच्छ भारत अभियानाचा औपचारिक शुभारंभ केला.
महात्मा गांधीजींचे निर्मळ भारताचे स्वप्न अद्यापही अपूर्ण असल्याचे  मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. अभियानाच्या शुभारंभानंतर राजपथवर आयोजित कार्यक्रमात   त्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात हे मत  व्यक्त केले.  उपस्थित  जनतेला यावेळी मोदी यांनी स्वच्छतेची शपथ दिली. 
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जनतेला निर्मळ भारताचा संदेश दिला. स्वच्छता ही फक्त सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे अशी मानसिकता  देशातील नागरिकांनी बदलली पाहिजे, स्वच्छता ही आपल्या सर्वांचीच  जबाबदारी आहे,  असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. स्वच्छ भारत अभियान हे राजकारणा पलिकडे आहे. याची प्रेरणा देशप्रेम आहे, राजकारण नाही असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. सामाजिक माध्यमांनीही या अभियानाचा अंगिकार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. 
मुंबईतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये आज उघडी असून, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता  शपथ घेतली. मध्य  रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतर्फे  विशेष स्वच्छता  अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात झाडणे, केरकचरा काढून टाकणे, बाजारातील, निवासी जागा तसेच  रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटविणे यांचा समावेश आहे. महात्मा गांधी  यांच्या 150 व्या जयंती निमित्त, वर्ष 2019  पर्यंत  निर्मळ भारत निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages