स्वच्छ भारतच्या ब्रँड अँम्बेसेडरची घोषणा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वच्छ भारतच्या ब्रँड अँम्बेसेडरची घोषणा

Share This
मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत' अभियानासाठी महाराष्ट्रातील नऊ जणांची बँड्र अँम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी, अभिषेक बच्चन, राजश्री बिर्ला, नीता अंबानी, अंजली भागवत, मोनिका मोरे, सुनिधी चव्हाण, मकरंद अनासपुरे आणि तुषार गांधी या नऊ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नऊ मान्यवरांची अँम्बेसेडर म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. पंतप्रधानांनी इंडिया गेटवर झालेल्या कार्यक्रमात भारतीयांना स्वच्छतेची शपथ दिली होती. याअगोदरच सेलिब्रिटी आणि अन्य मान्यवर मोहिमेत सहभागी झाले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, सानिया मिर्झा यांचा समावेश आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्वप्रथम राज्यात स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छ भारत अभियानाला तळागाळातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नऊ मान्यवरांची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छता अभियानाचा लोगो कोल्हापूरच्या अनंत खासबाजदार आणि शिरीष खांडेकर यांनी तयार केला आहे.

राज्यपालांनी गुरुवारी मंत्रालय येथे स्वत: साफसफाई करून स्वच्छ भारत अभियानाची औपचारिक सुरुवात केली. राज्यपालांचे सल्लागार अनिल बैजल, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे तसेच मंत्रालयातील अनेक अधिकार्‍यांनीदेखील या वेळी हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. राजभवन येथेदेखील राज्यपालांनी पत्नी विनोदा यांच्यासह स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages