मुंबईत 'भीमशक्ती'चा हल्लाबोल मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत 'भीमशक्ती'चा हल्लाबोल मोर्चा

Share This
मारेकर्‍यांना तत्काळ अटक करा - चंद्रकांत हंडोरे
अहमदनगरचे कलेक्टर आणि एसपी निलंबित करा
Displaying _MG_7427.JPG
मुंबई : जवखेडे गावातील जाधव कुटुंबाच्या तिघांचे हत्याकांड करणार्‍यांना तत्काळ अटक करा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निलंबित करा, जाधव तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या आणि अहमदनगर हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा, अशी मागणी करतानाच जर यात चालढकल केली गेली तर आम्ही भाजपा सरकारला सोडणार नाही. पुन्हा यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मंगळवारी दिला. 

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावातील जाधव कुटुंबीयांच्या तिहेरी हत्याकांडाला महिना उलटला तरी आरोपींना अटक होत नसल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी जनतेने मंगळवारी माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखालील भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून सेंट जॉर्ज रुग्णालय ते आझाद मैदान असा मंत्रालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना हंडोरे यांनी भाजपा सरकारवर हल्ला चढवला. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या एक वर्षात अत्त्याचाराच्या १0२ घटना घडल्या, असे सांगत हा जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर झाला पाहिजे, असे सरकारला बजावले.

जवखेडे गावात तिहेरी हत्याकांड घडले त्याला एक महिना दोन दिवस झाले तरीही अजून मारेकरी पोलिसांना सापडत नाहीत. पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत म्हणून हत्यारे पकडले जात नाहीत की अशा घटनांमुळे दलित समाजात असलेला आक्रोश दाबून टाकण्यासाठी मुद्दाम तपास केला जात नाही, असा सवाल करून हंडोरे म्हणाले की, मारेकरी पकडायचे सोडून हत्या झालेल्या जाधव कुटुंबीयांचीच पोलीस चौकशी करीत आहेत. कुटुंबीयांनीच हत्याकांड केले, असे पोलिसांना कुणी सांगितले आहे की, हे दलितांनीच केले, असे पोलिसांना सांगितले गेले, म्हणून पोलीस तपास होत नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. खैरलांजी हत्याकांड प्रकरणातही आधी असेच घडले. मोर्चा काढले, आंदोलने केली, आमच्या लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला तरच अशा घटनेत पोलीस गुन्हा नोंदवतात. नाही तर पोलीस स्टेशनला आमचे लोक तक्रार करायला गेले तर पोलीस त्यांनाच दम देतात. खैरलांजी घडले तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख तत्काळ घटनास्थळी गेले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवखेड्यात अजूनही गेले नाहीत, अशी टीका हंडोरे यांनी केली. गुन्हे नोंदवताना पोलीस त्यात त्रुटी ठेवतात त्यामुळे अँट्रॉसिटी केसमध्ये आरोपी लगेच जामिनावर सुटतात आणि दुसर्‍या दिवशी पोलिसांना हाताशी धरून आमच्या माणसांवर दरोड्याच्या केसेस टाकतात, आमच्या लोकांना त्रास देतात, असा आरोपही त्यांनी केला. 

अमानवीय व क्रूरपणे हत्या करणार्‍या आरोपींना फाशी द्या, जाधव कुटुंबीयांना ५0 लाख रुपयांची मदत द्या, हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, आंदोलन करणार्‍या आंबेडकरी जनतेवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.

मामाच्या गावाला जायला वेळ आहे; जवखेड्याला नाही काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी घणाघाती भाषणाने मोर्चेकर्‍यांमध्ये चैतन्य आणले. त्यांनी भाजपा आणि सरकारवर तोफ डागली. देशात कमळ, खासदार कमळ, आमदार कमळ मग मळमळ कुठे का दिसत नाही. जवखेड्यात तिहेरी हत्याकांड झाले तरी भाजपावाल्यांच्या पोटात मळमळ कशी होत नाही? असा बोचरा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री अजून जवखेड्याला गेले नाहीत, याचा संदर्भ देत मामाच्या गावाला जायला वेळ मिळतो; पण जवखेडे गावात जायला राज्याच्या प्रमुखाला वेळ नाही, असा चिमटा भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता काढला.

तंटामुक्ती रद्द करा!
खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव म्हणून जाहीर केले. त्याचे प्रमाणपत्र घेऊन खैरलांजीत भोतमांगे हत्याकांड केले गेले. जवखेडे ग्रामपंचायतीला तंटामुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले आणि ते घेऊन जाधव कुटुंबीयांचे तिहेरी हत्याकांड केले, मग कशाला हवी ही तंटामुक्ती, ती रद्द करा, अशी आग्रही मागणी हंडोरे यांनी त्यांच्या भाषणात केली

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages